प्रख्यात शिवकथाकार आणि धर्मभास्कर अशी उपाधी मिळालेले सद्गुरूदास महाराज उपाख्य विजयराव देशमुख (८४) यांचे बुधवारी सायंकाळी ७ वाजून ५ मिनिटांनी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.
छत्रपती सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक व गुरुमंदिर परिवाराचा आधारस्तंभ निखळला आहे.
अभ्यासपूर्ण विवेचन, रसाळ व ओघवती भाषाशैली हे त्यांच्या व्यक्तीमत्वाची ओळख होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र तळागाळात पोचवण्यासाठी सद्गुरूदास महाराजांनी आपले अखंड आयुष्य वाहून घेतले. छत्रपतींना अपेक्षित रयतेचे राज्य तळागाळात रुजवण्यात सद्गुरूदास महाराजांनी मोलाची कामगिरी केली. अथक परिश्रम, संशोधन, असंख्य साधने, कागद-पत्रांचा चिकित्सक अभ्यास करत सद्गुरूदास महाराजांनी त्याला पुरावे आणि दाखल्यांची जोड दिली. रसाळ व ओघवती भाषाशैली हे त्यांच्या शिवचरित्राचे वैशिष्ट्य होते. त्यांनी लिहिलेचे शककर्ते शिवराय हे द्विखंडात्मक शिवचरित्र अल्पावधीतच रसिकमान्य झाले. शिवकार्य हा त्यांच्या जीवनाचा दैदिप्यमान पूर्वार्ध तर गुरुकार्य हा उत्तरार्ध होता.
सदगुरुदास महाराजांना लहानपणापासूनच शिवाजी महाराजांबद्दल आकर्षण होते. वाचनाची आवड, निडरता, धाडसी, वृत्ती, तरल संवेदनशील मन, एकाग्रता हे गुण बाळगत त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षी जीवनाचे ध्येय निश्चित केले. त्या दिवसापासून आजतागायत परमपूज्य विष्णुदास महाराजांच्या आज्ञेनुसार त्यांनी स्वतःला वाहून घेतले. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांची शिवचरित्रावर व्याख्याने ऐकली आणि त्यांचे शिवप्रेम अधिकच वृद्धिंगत झाले.
त्यानंतर सदगुरुदास महाराजांनी तरुणांना कथा रूप शिवचरित्र सांगण्यास सुरुवात केली. गणेशोत्सवापासून व्याख्यानामालेच्या माध्यमातून त्यांची शिवचरित्र सांगण्याची भाषा शैली, वक्तृत्व अल्पावधीतच भावले. यातून जनमानसानेच त्यांना शिवकथाकार ही पदवी बहाल केली. यातूनच त्यांनी शिवदुर्ग दर्शन यात्रेची कल्पना मांडत १९७४ ला गुढीपाडव्याच्या सुमुहूर्तावर शिवदुर्ग यात्रा काढली. रायगडावर छत्रपतींच्या सिंहासनाजवळची माती कपाळी लावून सदगुरुदासांनी "महाराज! मी सर्व सामर्थ्यांनीशी आपली शब्दपूजा बांधीन." असा प्रण केला. त्यांची ही शिवदुर्ग यात्रा १९९२ पर्यंत अखंड चालली.
याच दरम्यान 'अभिनव ठेव योजना' अंतर्गत पाच वर्षासाठी लोकांकडून शंभर रुपयांची ठेव घ्यायची व त्याच्या व्याजावर ग्रंथ निर्मितीचा खर्च करून, पाच वर्षानंतर ठेवेसह ग्रंथ लोकांना विनामूल्य द्यायचा. या अभिनव योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. शिवचरित्र लिहीत असतानाच 'सिंहासनाधीश्वर' हे नाटक, 'महाराजांच्या मुलखात', 'सूर्यपुत्र' आदि ग्रंथांची सदगुरुदास महाराजांनी निर्मिती केली.
रामायण, महाभारत, तसेच दासबोध, ज्ञानेश्वरी, श्रीगुरुचरित्र आदि संत वाङ्मयाचा सखोल अभ्यास व त्यावर शेकडो प्रवचने. निस्पृहपणे व्रतस्थ राहून आपल्या अफाट संघटन कौशल्याने लोकोत्सव व आध्यात्मिक शिबिरे आयोजित केली. गुरुवार १६ फेब्रुवारी १९८४, माघ पौर्णिमेला पूजनीय विष्णुदास महाराजांकडून अनुग्रह मिळाल्यानंतर आणि विष्णुदास महाराजांनी त्यांना आपल्या गळ्यातील माळ घालून दत्तपरंपरेचा वारसा दिला. १९९० साली विष्णुदास महाराज समाधिस्थ झाल्यावर त्यांच्याच आज्ञेने सद्गगुरुदास महाराजांनी जयप्रकाशनगरात उपासना केंद्र सुरु केले. त्याचे १९९१ ला श्रीविष्णुदास महाराजांनी ध्यानात 'सद्गुरुदास' असे नामकरण केले. त्यांच्याच प्रेरणेतून १९९० पासून श्रीगुरुमंदिरात श्रीदत्तजयंती उत्सव अतिशय उत्साहात साजरा करण्यात येतो