रहस्य आनंदाचे...
मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. आपण एकटे सुखी राहू शकत नाही. आपल्या आजूबाजूच्या माणसांच्या सुख-दुःखाचा परिणाम आपल्या मनावर होत असतो. म्हणूनच “दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद मानणे” ही जीवनातील अत्यंत सुंदर भावना आहे.
एखाद्या व्यक्तीला मदत केल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधानाचे हास्य पाहणे, एखादा व्यक्ती आजारी आहे त्यावेळी केलेली मदत,एखाद्या गरजू विद्यार्थ्याला शैक्षणिक साहित्य देणे, दुःखी व्यक्तीला धीर देणे किंवा एखाद्याच्या यशाचे मनापासून कौतुक करणे—या छोट्या-छोट्या गोष्टींमधून आपल्यालाही मोठा आनंद मिळतो. दुसऱ्याला आनंद देण्यासाठी नेहमी मोठे काम करण्याची गरज नसते. प्रेमाचे दोन शब्द, आपुलकीची विचारपूस आणि योग्य वेळी केलेली छोटीशी मदतही कोणाच्या तरी जीवनात आनंद निर्माण करू शकते.
आजच्या स्पर्धात्मक युगात दुसऱ्याच्या यशाकडे पाहताना मत्सर करण्याची प्रवृत्ती वाढताना दिसते. मात्र दुसऱ्याच्या यशाचा आनंद मनापासून साजरा केला, तर आपले मन अधिक सकारात्मक आणि आनंदी बनते. दुसऱ्याला खाली खेचण्यात नव्हे, तर त्याला पुढे जाण्यास मदत करण्यात खरा आनंद आहे.
शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या प्रगतीत आनंद मानणे, पालकांनी मुलांच्या छोट्या यशाचे कौतुक करणे, मित्रांनी एकमेकांना अडचणीच्या वेळी साथ देणे आणि समाजातील प्रत्येकाने गरजू व्यक्तीला मदतीचा हात देणे—यातून समाजात प्रेम, सहकार्य आणि माणुसकी वाढते.
आनंद ही अशी गोष्ट आहे की ती वाटल्याने कमी होत नाही; उलट वाढत जाते. आपण एखाद्याच्या चेहऱ्यावर हास्य आणले, तर त्या हास्याचा आनंद आपल्या मनातही उमटतो. म्हणूनच जीवनात केवळ “मला काय मिळेल?” असा विचार न करता “मी दुसऱ्याला काय देऊ शकतो?” असा विचार केला पाहिजे.
शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते—
दुसऱ्याच्या डोळ्यांतील आनंदाची चमक आपल्या मनाला समाधान देते. दुसऱ्याचे दुःख कमी करण्याचा आणि त्याच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करणे, हीच खरी माणुसकी आहे.
“स्वतः आनंदी राहा आणि इतरांनाही आनंदी ठेवा; कारण दुसऱ्याच्या आनंदातच आपल्या आनंदाचे खरे प्रतिबिंब असते.”
विजयकुमार किसन भुजबळ
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुभाष नगर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा